सफरचंद दालचिनी सोया शेक – मधुमेह आहार मराठी

सफरचंद दालचिनी सोया शेक – 

आजची मधुमेह स्पेशल रेसिपी मध्ये आपण आज सफरचंद शेक बनवणार आहोत जो आरोग्याला चांगला आहे. यात आपण मधुमेह रुग्णांची रक्ताची पातळी नियंत्रणात राहील याचा विचार केला आहे.

ह्यात दालचिनी चा वापर केल्याने मधुमेह किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. याशिवाय सालासकट सफरचंद घेतल्याने यात सोल्यूबल फायबर ची मात्रा वाढते त्याने एक जेल सारखे मिश्रण पोटात तयार होऊन कोलेस्टेरॉल व शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत होते.

ही माहिती मी एका व्यक्तीला पुरेल ह्या हिशेबाने लागणार्‍या सामग्री चे वर्णन करत आहे.

सफरचंद दालचिनी सोया शेक

 

साहित्य :

  • सफरचंदाचे तुकडे साली सकट न सोललेले ( अर्धा कप)
  • दालचीनी पाउडर (एक चिमुट)
  • थंडगार सोया मिल्क / लो फॅट मिल्क (एक कप)
  • साखरेचा पर्याय / स्टीवीया / पर्यायी (एक चमचा)

कृती किंवा तयार करण्याची पद्धत :

  • सगळे पदार्थ मिक्सर मध्ये एकत्र करा आणि मिश्रण बारीक आणि फेसाळ होई पर्यंत मिश्रित करा
  • तयार झालेला शेक ग्लास मध्ये ओता
  • त्वरित खाऊ घाला

तुम्हाला जर ही रेसीपी आवडली असल्यास तुमच्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद

 

मधुमेह किंवा डायबेटिस असलेल्या रुग्णांनी कोणत्या चाचण्या कराव्या?

मधुमेह ह्या आजारात मुख्यतः रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्त हे सर्व शरीरभर रक्तवाहिन्यांतुन फिरते सोबत ही वाढलेली साखर देखील सर्व शरीरात आणि अवयवांना पोहोचवते. हे अवयवांना इजा करू लागले की आपल्याला त्रास जाणवू लागतो. त्यामुळे मुळात ह्या रक्तातील वाढलेल्या साखरेचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

आता जेव्हा आपण मधुमेह नियंत्रण हा शब्द संबोधतो त्यात तपासणी आणि उपचार हे दोन्ही येत, सोबत आहार पथ्य आणि व्यायाम सुद्धा आला.

आपण आज तपासणी ह्याबद्दल जाणून घेणार आहोत.

साधारणतः मूत्रपिंड किंवा किडनीचा उंबरठा हा 180mg/dl इतका आहे. त्यापुढे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास साखर लघवी मध्ये येण्यास सुरू होते. ह्या उंबरठ्यात मधुमेह रुग्णांमध्ये बराच चढउतार होतो आणि साखर लघवीत येऊ लागते.

मधुमेह तपासणी

 

मधुमेह किंवा डायबेटिस असलेल्या रुग्णांनी खालील चाचण्या कराव्यात :-

मधुमेह रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने खालील चाचण्या करून घ्याव्यात कारण काही वेळा खाली नमूद केलेल्या तपासण्यां व्यतिरिक्त आणखी काही तपासणीची गरज भासू शकते.

  • रिकामी पोटी रक्तातील साखरेची तपासणी (fasting blood sugar test) –

    ह्यात निदान 8-12 तासांचा उपवास असणे गरजेचे आहे. रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची मात्रा ही साधारण पणे 100-110mg/dl च्या खाली ठेवणे आवश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात ह्या चाचणीचे मूल्य फार आहे कारण जर दिवसाची सुरुवातच जास्त साखरेच्या पातळीने होत असेल तर जेवणानंतर तर अजून रक्तातील साखरेची पातळी वाढेल त्यामुळे सर्वप्रथम ती नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

  • 2 तास जेवणानंतर रक्तातील साखरेची तपासणी ( 2 hr post prandial blood sugar test) –

    ह्या चाचणीत आपल्याला कल्पना येते की आपण जेवल्यावर साखरेचे प्रमाण किती वाढते. बहुतांश रुग्णांमध्ये ही चाचणी जास्त दाखवते कारण भारतीय लोकांच्या आहारात कार्बोहाइड्रेटचे प्रमाण जास्त असते. ही चाचणी करण्यापुर्वी तुमच्या मधुमेहाच्या नियमित गोळ्या घ्यायला विसरू नका.

  • ग्लायकोसायलेटेड हीमोग्लोबिन (HbA1c)-

    ही फार महत्वाची चाचणी आहे. ह्यात मागील तीन महिन्यांची रक्तातील साखरेची सरासरी कळते. ही चाचणी खाण्याच्या मात्रेने किंवा प्रकाराने बदलत नाही त्यामुळे ही जास्त विश्वासदायक आहे. चांगले मधुमेहाचे नियंत्रण म्हणजे ही चाचणी सात (HbA1c <7) च्या खाली ठेवणे. या व्यतिरिक्त अभ्यासातून असे लक्षात आले आहे की जो मधुमेह रुग्ण पहिले पाच वर्ष मधुमेहाच्या सुरवातीपासून ही चाचणी सात च्या खाली नियंत्रणात ठेवतो त्याला पाच वर्षानंतर जरी गोळ्या बंद केल्या तरी 95% कमी मधुमेहाचे दुष्परिणाम पुढील आयुष्यात शरीरावर होतात. ह्याला “लेगसी इफेक्ट” किंवा मेटबोलीक मेमरी असे म्हणतात.

  • सीरम क्रिऐटीनीन (serum creatinine) –

    ही देखील एक फार महत्वाची चाचणी आहे. साठीच्या पुढील रुग्णांनी ही निदान सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी करावी. ह्या चाचणीत आपल्याला किडनीची कार्यक्षमता ह्याचा अंदाजा येतो. बर्‍याच मधुमेह च्या गोळ्या ह्या किडनीतून शरीराबाहेर टाकल्या जातात त्यामुळे जर किडनी नीट काम करत नसेल तर त्यांचा शरीरात संच होऊन शुगर लेवल खाली जाण्याची (Hypoglycemia) शक्यता वाढते.

  • लिपिड प्रोफाईल (Lipid Profile) –

    ही चाचणी रक्तातील चर्बीची मात्रा दाखवते. ह्यात कोलेस्टेरॉल, ट्रायगलीसेराइड आणि एल डी एल (LDL) ह्या गोष्टी कमी ठेवणे आवश्यक आहे. ह्याचे प्रमाण रक्तात वाढल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा संभव वाढतो. एच डी एल (HDL) हे चांगले कोलेस्टेरॉल असून ते वाढलेले असावे.

  • ह्याव्यतिरिक्त मधुमेह चाचण्या –

    वर नमूद केलेल्या मुख्य चाचण्यां व्यतिरिक्त डॉक्टर तुम्हाला बाकी काही चाचण्या गरजे नुसार करावयास सांगतात. ह्यात लघवीची तपासणी (Urine routine), छातीची पट्टी (ECG), छातीची फिल्म (Xray) ईत्यादींचा समावेश होतो.

तुम्हाला ह्या विषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स मध्ये विचारा. मी मुद्दाम फेसबुक कमेंट्स पण ठेवल्या आहेत सोप्या पडाव्या म्हणुन.

माहिती आवडल्यास आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

मधुमेह असलेल्या रुग्णांनी किडनी चे रक्षण कसे करावे?

मधुमेह असलेल्या रुग्णांनी किडनी चे रक्षण किंवा बचाव कसा करावा?

या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपल्याला आधी मधुमेह म्हणजे नेमक काय आहे हे कळणे गरजेचे आहे.

आपल्याला एवढ मात्र नक्की माहितीये की मधुमेहामध्ये रक्तात साखरेचे प्रमाण वाढलेले असते. आपण साधा विचार करायला हवा की रक्त तर डोक्याच्या केसापासुन पायाच्या नखा पर्यंत सर्वत्र जातेय आणि ते गरजेचे आहे नाहीतर सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि जीवनावश्यक गोष्टी कशा पुरवता येणार पण रक्तासोबत वाढलेली साखर देखील सर्वत्र जातेय आणि ती नकळत मागे हळूहळू अवयवांना पोखरत आहे. जो पर्यंत ती एखादा अवयव डॅमेज करत नाही तो पर्यंत आपल्याला लक्षणे दिसत नाहीत आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जर अगोदरच शुगर नियंत्रणात ठेवली असती तर हे झालच नसत हे आपण लक्षात घ्यायला हवे.

त्यामुळे किडनीच काय शरीरातील प्रत्येक अवयव वाढलेल्या रक्तातील साखरेने डॅमेज होऊ शकतो मग त्यात सर्व अवयव आले अगदी हृदय, नसा, डोळ्यांचा पडदा, रक्त वाहिन्या, हाड सर्वच.

आता मूळ मुद्द्यावर येतो. किडनी किंवा मूत्रपिंडाच रक्षण करण्यासाठी 5 गोष्टी फार आवश्यक आहेत.
त्या खालील प्रमाणे –

  • रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य नियंत्रणात ठेवणे.

    मधुमेह नियंत्रण योग्य असणे म्हणजे जी मधुमेहाची तीन महिन्याची चाचणी ग्लायकोसायलेटेड हीमोग्लोबिन (HbA1c) आहे तिचा रीपोर्ट (<7) सात च्या खाली राहिला पाहिजे आणि ते ही लो शुगर न होता. UKPDS स्टडी ने असे निदर्शनास आले आहे की जे नवे मधुमेह रुग्ण आहेत त्यांनी ही चाचणी जर आयुष्यातल्या पहिल्या पांच वर्षात चांगली ठेवली (HbA1c <7) तर त्यांना पुढील आयुष्यात गोळ्या बंद केल्या तरी 95% शरीरावर होणारे वाईट परिणाम कमी होतात. याला ‘लेगसी इफेक्ट‘ किंवा ‘मेटबोलीक मेमरी‘ असे म्हणतात.

  • उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे.

    उच्च रक्तदाबामुळे मुख्यतः किडनी आणि डोळ्यांचा पडदा यांना सर्वात आधी आणि जास्त दुखापत होते. तसेच जगातील एकूणच हृदय विकारांनी होणारी मृत्यंची संख्या पाहिली असता निम्म्याहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदर्शनास येते. किडनी किंवा मूत्रपिंड हे एक गाळणी सारख काम करत की ज्यात शरीरातील रक्त गाळले जाते आणि सर्व शरीरास उपयोगी गोष्टी राखून बाकीचे उत्सर्जक गोष्टी लाघवी मार्फत शरीराबाहेर टाकल्या जातात. या प्रक्रियेत उच्च रक्तदाबामुळे किडनी वर ताण येऊन काही चांगल्या शरीराला आवश्यक गोष्टी देखील मूत्रामार्गे शरीराबाहेर टाकल्या जातात. यात (albumin) नामक प्रथिने सर्वात आधी जाऊ लागतात. प्रथिने हे शरीराला बळकट करण्यासाठी महत्त्वचा घटक असल्याने शरीर कमजोर होऊ लागते.

  • वेदनाशामक (painkiller) औषधे घेणे टाळणे.

    बरीच वेदनाशामक औषधे प्रामुख्याने मूत्रपिंडावर असर करतात. यात NSAIDS ह्या श्रेणीतील औषधांचा समावेश होतो. ह्यात आपण जी रोजाना अंगदुखी, पायदुखी, कंबर दुखी ईत्यादी साठी जी वेदना शामक औषध घेतो ती येतात. त्यामुळे ती टाळणे गरजेचे आहे. जर आपण वेदना शामक औषधाचे मलम एखाद्या मोठ्या पृष्ठ भागावर (कंबर, पाठ वगैरे) लावत असाल तरी ते शरीरात शोषून घेतले जाते. त्यामुळे ते देखील टाळणे महत्त्वाचे आहे.

  • शरीरातील पाण्याची मात्रा कमी होऊ न देणे (avoid Dehydration).

    मधुमेह रुग्णांनी नेहमीच जास्त पाणी पिणे गरजेचे आहे कारण रक्तातील साखर वाढली असेल तर सारखे लघवीला जावे लागते आणि त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. पण ज्या मधुमेह रुग्णांना हृदय विकार किंवा किडनी आजार (CKD) अगोदर पासून असेल तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलेली पथ्य आणि नियम पाळणे आवश्यक आहेत अशा रुग्णांना बर्‍याचदा पाणी पिण्याची मर्यादा दिली असते ती पाळणे जरूरी आहे. मधुमेह पेशंट मध्ये जेव्हा कधी उलटी किंवा जुलाब होतात तेव्हा शरीरातील पाण्याची मात्रा (Dehydration) कमी होण्याची शक्यता असते तेव्हा ती भरून काढणे जरूरी आहे. अशावेळी जर जेवण कमी होत असेल तर मधुमेह गोळीचा डोस कमी करणे आवश्यक आहे कारण लो शुगर किंवा ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची शक्यता वाढते.

  • तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान बंद करणे.

    तंबाख आणि धूम्रपान केल्यामुळे रक्ताची viscosity वाढते म्हणजे थोडक्यात रक्त जाड होऊ लागते त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्याना अडथळा निर्माण होतो. अशाने ‘हार्ट अ‍ॅटॅक’ किंवा ‘स्ट्रोक अ‍ॅटॅक’ (लकवा येणे) यांचा धोका वाढतो. शिवाय रक्त जाड झाल्याने सर्व शरीरभर रक्तवाहिन्यांना इजा (Atherosclerosis) होऊ लागते. मग यात मूत्रपिंडाला पुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांचा देखील समावेश आहे. प्रमाणाबाहेर मद्यपान केल्याने यकृताला इजा होते शिवाय मधुमेहाच्या बर्‍याच गोळ्या ह्या लिवर मध्ये तुटतात त्यामुळे लिवर डॅमेजचा धोका उद्भवतो. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान पूर्णतः बंद केले पाहिजे.

मी दिलेली माहीती जर तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्र परिवारांसोबत व्हाटसेप, फेसबुक वर शेअर करा. माझ्या फेसबुक पेज ला लाइक करा आणि अशाच वैज्ञानिक माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबसकाराइब करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

डॉ निखिल प्रभु

मधुमेह स्पेशलिस्ट

दुध, दूधावरील साय मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी खाणे योग्य आहे काय?

दुध, दूधावरील साय मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी खाणे योग्य आहे काय?

मधुमेह असलेल्या रुग्णांनी दूध पिणे चांगले आहे कारण त्यात प्रोटीन आणि कॅल्शियम यांचे प्रमाण चांगले असते. परंतु कोणते दूध मधुमेह रुग्णांनी प्यावे यात बराच फरक आहे तो कसा हे मी थोडक्यात समजेल असे सांगतो.

आपण जेव्हा दूध पितो तेव्हा त्यात फॅट असते आता ह्या फॅट (fat) च्या मात्रेनुसार कोणते दूध मधुमेह असणार्‍या व्यक्तीला चांगले हे ठरते.

दुध गाई म्हशी चे

मधुमेह असणार्‍यांना कमी फॅट किंवा फॅट विरहित दूध पिणे चांगले.

दुधावरची साय म्हणजे संपूर्ण फॅट असल्यामुळे ती खाणे मधुमेह असणार्‍यांनी टाळावं. या शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थ जसे की दही, ताक हे मधुमेह असणार्‍यांना घेणे चांगले आहे परंतु तूप, लोणी, बटर, चीज, घी ईत्यादी खाणे टाळावं.

आता बाजारात मिळणार्‍या दुधामध्ये बरेच प्रकार आहेत. ते म्हणजे टोन दूध, डबल टोन दूध आणि स्कीम दूध.

हे सांगण्याआधी प्रथम लक्षात घ्या की म्हशीच्या दुधात फॅट हे जवळपास 6% असते तर गायीच्या दुधात ते जवळपास 3% असते त्यामूळे गायीचे दुध हे मधुमेह असणार्‍यांना पिणे चांगले म्हशीच्या दुधाहून.

सर्वात कमी फॅट असणारे दूध म्हणजे स्कीम दूध हे मधुमेह किंवा हृदय विकार असणार्‍यांना पिणे सर्वात चांगले. स्कीम दुधात अगदी नगण्य म्हणजे 0.5% हून कमी फॅट असते.

डबल टोन दुधात फॅट ची मात्रा जवळपास 1.5% तर टोन दुधात ही मात्रा जवळपास गाई च्या दुधा इतकी म्हणजे 3% एवढी असते.

त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्ही गाईच किंवा म्हशीचे दूध पीत असाल तर दूध उकळून साय बाजूला काढून ठेवा.

स्कीम दुधाचे काही फायदे खाली नमूद करतो :-

  • वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
  • लट्ठपणाशी संबंधीत असलेले प्रॉब्लेम आणि छातीत जळजळ, ऐसीडीटी नियंत्रण
  • आतड्याच्या कर्करोगाची रिस्क कमी होते
  • मधुमेह आणि हृदय विकाराचा धोका कमी होण्यास मदत
  • मधुमेह असणार्‍यांना दुधाचा सर्वात चांगला पर्याय
  • हाडे ठिसूळ होणे (osteoporosis) यात जास्त प्रथिने, कॅल्शियम आणि कमी फॅट असणे उपयुक्त.

तुम्हाला जर मी दिलेली माहिती उपयोगी वाटल्यास आमच्या फेसबुक पेज ला लाइक करा आणि हे उत्तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

डॉ निखिल प्रभु

मधुमेह स्पेशलिस्ट

मुंबई