मधुमेह असलेल्या रुग्णांनी किडनी चे रक्षण कसे करावे?

मधुमेह असलेल्या रुग्णांनी किडनी चे रक्षण किंवा बचाव कसा करावा?

या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपल्याला आधी मधुमेह म्हणजे नेमक काय आहे हे कळणे गरजेचे आहे.

आपल्याला एवढ मात्र नक्की माहितीये की मधुमेहामध्ये रक्तात साखरेचे प्रमाण वाढलेले असते. आपण साधा विचार करायला हवा की रक्त तर डोक्याच्या केसापासुन पायाच्या नखा पर्यंत सर्वत्र जातेय आणि ते गरजेचे आहे नाहीतर सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि जीवनावश्यक गोष्टी कशा पुरवता येणार पण रक्तासोबत वाढलेली साखर देखील सर्वत्र जातेय आणि ती नकळत मागे हळूहळू अवयवांना पोखरत आहे. जो पर्यंत ती एखादा अवयव डॅमेज करत नाही तो पर्यंत आपल्याला लक्षणे दिसत नाहीत आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जर अगोदरच शुगर नियंत्रणात ठेवली असती तर हे झालच नसत हे आपण लक्षात घ्यायला हवे.

त्यामुळे किडनीच काय शरीरातील प्रत्येक अवयव वाढलेल्या रक्तातील साखरेने डॅमेज होऊ शकतो मग त्यात सर्व अवयव आले अगदी हृदय, नसा, डोळ्यांचा पडदा, रक्त वाहिन्या, हाड सर्वच.

आता मूळ मुद्द्यावर येतो. किडनी किंवा मूत्रपिंडाच रक्षण करण्यासाठी 5 गोष्टी फार आवश्यक आहेत.
त्या खालील प्रमाणे –

  • रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य नियंत्रणात ठेवणे.

    मधुमेह नियंत्रण योग्य असणे म्हणजे जी मधुमेहाची तीन महिन्याची चाचणी ग्लायकोसायलेटेड हीमोग्लोबिन (HbA1c) आहे तिचा रीपोर्ट (<7) सात च्या खाली राहिला पाहिजे आणि ते ही लो शुगर न होता. UKPDS स्टडी ने असे निदर्शनास आले आहे की जे नवे मधुमेह रुग्ण आहेत त्यांनी ही चाचणी जर आयुष्यातल्या पहिल्या पांच वर्षात चांगली ठेवली (HbA1c <7) तर त्यांना पुढील आयुष्यात गोळ्या बंद केल्या तरी 95% शरीरावर होणारे वाईट परिणाम कमी होतात. याला ‘लेगसी इफेक्ट‘ किंवा ‘मेटबोलीक मेमरी‘ असे म्हणतात.

  • उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे.

    उच्च रक्तदाबामुळे मुख्यतः किडनी आणि डोळ्यांचा पडदा यांना सर्वात आधी आणि जास्त दुखापत होते. तसेच जगातील एकूणच हृदय विकारांनी होणारी मृत्यंची संख्या पाहिली असता निम्म्याहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदर्शनास येते. किडनी किंवा मूत्रपिंड हे एक गाळणी सारख काम करत की ज्यात शरीरातील रक्त गाळले जाते आणि सर्व शरीरास उपयोगी गोष्टी राखून बाकीचे उत्सर्जक गोष्टी लाघवी मार्फत शरीराबाहेर टाकल्या जातात. या प्रक्रियेत उच्च रक्तदाबामुळे किडनी वर ताण येऊन काही चांगल्या शरीराला आवश्यक गोष्टी देखील मूत्रामार्गे शरीराबाहेर टाकल्या जातात. यात (albumin) नामक प्रथिने सर्वात आधी जाऊ लागतात. प्रथिने हे शरीराला बळकट करण्यासाठी महत्त्वचा घटक असल्याने शरीर कमजोर होऊ लागते.

  • वेदनाशामक (painkiller) औषधे घेणे टाळणे.

    बरीच वेदनाशामक औषधे प्रामुख्याने मूत्रपिंडावर असर करतात. यात NSAIDS ह्या श्रेणीतील औषधांचा समावेश होतो. ह्यात आपण जी रोजाना अंगदुखी, पायदुखी, कंबर दुखी ईत्यादी साठी जी वेदना शामक औषध घेतो ती येतात. त्यामुळे ती टाळणे गरजेचे आहे. जर आपण वेदना शामक औषधाचे मलम एखाद्या मोठ्या पृष्ठ भागावर (कंबर, पाठ वगैरे) लावत असाल तरी ते शरीरात शोषून घेतले जाते. त्यामुळे ते देखील टाळणे महत्त्वाचे आहे.

  • शरीरातील पाण्याची मात्रा कमी होऊ न देणे (avoid Dehydration).

    मधुमेह रुग्णांनी नेहमीच जास्त पाणी पिणे गरजेचे आहे कारण रक्तातील साखर वाढली असेल तर सारखे लघवीला जावे लागते आणि त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. पण ज्या मधुमेह रुग्णांना हृदय विकार किंवा किडनी आजार (CKD) अगोदर पासून असेल तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलेली पथ्य आणि नियम पाळणे आवश्यक आहेत अशा रुग्णांना बर्‍याचदा पाणी पिण्याची मर्यादा दिली असते ती पाळणे जरूरी आहे. मधुमेह पेशंट मध्ये जेव्हा कधी उलटी किंवा जुलाब होतात तेव्हा शरीरातील पाण्याची मात्रा (Dehydration) कमी होण्याची शक्यता असते तेव्हा ती भरून काढणे जरूरी आहे. अशावेळी जर जेवण कमी होत असेल तर मधुमेह गोळीचा डोस कमी करणे आवश्यक आहे कारण लो शुगर किंवा ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची शक्यता वाढते.

  • तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान बंद करणे.

    तंबाख आणि धूम्रपान केल्यामुळे रक्ताची viscosity वाढते म्हणजे थोडक्यात रक्त जाड होऊ लागते त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्याना अडथळा निर्माण होतो. अशाने ‘हार्ट अ‍ॅटॅक’ किंवा ‘स्ट्रोक अ‍ॅटॅक’ (लकवा येणे) यांचा धोका वाढतो. शिवाय रक्त जाड झाल्याने सर्व शरीरभर रक्तवाहिन्यांना इजा (Atherosclerosis) होऊ लागते. मग यात मूत्रपिंडाला पुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांचा देखील समावेश आहे. प्रमाणाबाहेर मद्यपान केल्याने यकृताला इजा होते शिवाय मधुमेहाच्या बर्‍याच गोळ्या ह्या लिवर मध्ये तुटतात त्यामुळे लिवर डॅमेजचा धोका उद्भवतो. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान पूर्णतः बंद केले पाहिजे.

मी दिलेली माहीती जर तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्र परिवारांसोबत व्हाटसेप, फेसबुक वर शेअर करा. माझ्या फेसबुक पेज ला लाइक करा आणि अशाच वैज्ञानिक माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबसकाराइब करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

डॉ निखिल प्रभु

मधुमेह स्पेशलिस्ट

Facebook Comments

डॉ निखिल प्रभु मुंबई आधारित सल्लागार मधुमेह विज्ञानी (मधुमेह स्पेशलिस्ट डॉक्टर) आहेत. डॉ निखिल प्रभु यांनी मधुमेह मध्ये पोस्ट ग्रॅड्युएशन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अंधेरी पश्चिम येथे केले आहे. | सदस्यताः - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल | इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) | एंडोक्राइन सोसायटी | मधुमेह संदर्भात ऑनलाइन whatsapp वीडियो consultation च्या appointment साठी 9082523295 या नंबर वर संपर्क करा

2 thoughts on “मधुमेह असलेल्या रुग्णांनी किडनी चे रक्षण कसे करावे?”

Leave a Comment